पावसाळी फ्रेम्स..पुन्हा

पावसाळी आठवणींकरता पाऊस पडावा लागत नाही पण पाऊस पडत असेल तर येणाऱ्या आठवणी थांबवतही नाही.
आज इथे पाऊस पडला, फार नाही सकाळपासून दोन तीन सरी येऊन गेल्या असतील पण त्यामुळे हवेत छान गारवा आहे आणि आकाशात गोळा झालेल्या ढगांमुळे एक परफेक्ट पावसाळी दिवस आहे.
पावसाळी आठवणी म्हणाले खरी पण पाऊस म्हंटलं को नक्की काय आठवत? धो धो पडणाऱ्या सरीवर सरी, विजांचा कडकडाट,सोसाट्याचा वारा, हे सगळं आठवतच पण बॅकग्राऊंड स्कोअर सारखं, सगळ्यात आधी आठवतात त्या वेगवेगळ्या जागा,त्यांच्यात पावसाने होणारे बदल,पाऊस पडून गेल्यावर क्षणात बदलून जाणारं त्या जागेचं रूप,पावसात न्हाउन तरारलेली झाडं, निवलेला वारा, स्वच्छ आभाळ आणि ह्या लोभस निसर्गरूपाने स्वतःमध्ये झिरपणारे चैतन्य!
पावसात आवडती जागा म्हणजे होस्टेलची रूम, तिच्यातून दिसणारा पाऊस.तो पाऊस जितका वेड लावणारा वाटलेला तितकाच सह्याद्रीच्या कडेकपारीत चढताना कोसळणारा पाऊसही आपला वाटलेला!
पण आता खूप ठळकपणे आठवतोय तो भीमाशंकरचा पाऊस.
भीमाशंकरला जाणचं मुळात पावसात झालंय. एकदा निवांतपणे गाडीत बसून जात होतो तर जोराचा पाऊस सुरू झाला, काचेपलीकडेचा पाऊस न भिजता पाहत होते,मागे गाणं सुरू होतं, ये साजिश है बुंदौकी,कोई ख्वाईश है चुपचुपसी..,पुन्हा परत येशील तेंव्हा भिजशीलचं असं वचन घेत गायबलेला पाऊस!
नंतर तिकडे गेले ते शिडीच्या वाटेने चढण्यासाठी.तेंव्हाच्या शिड्या अवघड होत्या आतापेक्षा . आदल्या रात्री पायथ्याच्या गावात मुक्कामाला राहिलेलो,भल्या पहाटे उठून चढायला सुरुवात केली.पहिली चढण सोपी होतीसमोर भीमाशंकर चा अजस्त्र कडा खुणावत होता. चढता चढता पहिल्या शिडीशी पोहोचलो आणि पाऊस कोसळायला सुरुवात झाली,इतका की दोन फुटावरचा माणूस दिसेना.सगळा परिसर धुक्यात वेढलेला, ढगांवरून चालतोय असं वाटायला लावणारा. एकेक निसरडी शिडी अंदाजे चढत होतो ,आधी त्या वाटेने जाऊन आलेले काही लोकं सोबत होते , त्यांनी सांगितलं कि त्या शिड्यांच्या पलीकडची दरी बरीच खोल आहे ,पाऊस नसताना चढलो तर डोळे फिरतात. पण आम्ही चढत होतो तेंव्हा इतकं धुकं होतं की त्याच्या आधारानेचं चढतोय असं वाटत होतं.पाठीवरची सॅक ,अंगावरचं जॅकेट ,कपडे सगळं भिजून चिंब झालेलं. 
शिड्या संपल्यावर सुरु झालेल्या पायवाट चिखलात हरवलेल्या,एक पाय उचलला कि दुसरा सटकतोय असं वाटत होतं , समोरून चालणाऱ्या दोघांनी पाय सटकल्याने चिखलात लोळण घेतली ,ते पाहून पायातले शूज आणि सॉक्स काढून  सॅकला लटकावले आणि चालू लागले . फार हुशारीचा निर्णय नव्हता खरा पण आयत्या वेळी तेच सुचलं ,तेवढीचं निसर्गाशी जवळीक साधतेय असा विचार डोकावला ,रानाची लेकरं रोज असंच अनवाणी चालत असतील त्या वाटांवरून ,आपणही थोडं चालून बघू ,चालत राहिले तस हळूहळू अनवाणी पायांचा विचार मागे पडला..
अजून थोडं चालले तस बाजूची झाडी खूप दाट झाली ,जंगल गडद झालंय ,विचारात हरवले तसा चालायचा वेग मंदावला असावा बहुथा कारण समोर चालणारी माणसं दिसेनाशी झाली आहेत,मागच्या माणसांची अजून चाहूल नाहीय ,रस्ता चुकले आहे का? पण सकाळपासून अविरत पडणाऱ्या पावसात भिजून,चालून,धडपडून, डोंगर चढून कुठलासा आत्मविश्वास जागा झालाय ,मी ह्या जंगलात हरवणार नाही ,हि जागा ओळखीची झालीय ,खरंतर आसपास कुणी नाहीय हेच बरंय ,आजूबाजूला केवढेसारे आवाज आहेत ..पावसाचे,रातकिड्यांचे ,ठाऊक नसलेल्या पक्षांचे ,त्यांत नको मिसळायला माणसांचा आवाज ,न जाणो तो ऐकून इथं मंद सप्तकात सुरु असलेलं संगीत थांबेल.. पायाखाली पानाफुलांचा सडा आहे , कुठलीशी रानफ़ळ आहेत आजूबाजूंच्या झाडांवर ,त्यांचा गोडसर वास सगळीकडे भरून राहिलाय .. 
आता पाऊस जरा विश्रांती घेतोय पण धुक्याची चादर तशीच गडद आहे.,ह्या धुक्यात वेढलेली झाडं अजून गूढ वाटताहेत ,ह्या सगळ्यात एक अदृश्य ओढ जाणवतेय ,असंच चालत राहावं अनंतापर्यंत ,इथलं संगीत ,हि शांतता ,पाऊस ,वारा ,धुकं हे सगळं अनुभवतं .. mystic beauty ह्या शब्दाचा अर्थ इथे कळतोय 
हे सगळं आपलंस आणि ओळखीचं का वाटतंय ,स्वतःला पडलेल्या काही कोड्यांचा उलगडा इथे झाल्यासारखा वाटतोय म्हणून असेल कदाचित ..आवडतं गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं आणि प्रत्येक वेळी त्याचा नवीन अर्थ कळवा तसं काहीसं घडतंय इथल्या नव्या वळणांवर ,तेच वातावरण परत नव्याने भारून टाकतंय .. 
पण आता झाडं विरळ होतं आहेत ,काही फुटांवरचा डांबरी रस्ता  गावं जवळ आल्याची जाणीव करून देतोय ,सोबतची माणसं माझी वाट पाहत थांबलेली दिसत आहेत ,आता धुकं निवळतंय ,आता माणसात परतायला हवं .. 
मेडिटेशन किंवा काय ते माहित नाही पण आताही ते वातावरण आठवलं की मन पिसासारखं हलकं होऊन तिथं पोहोचतं


0 comments:

 
Blogger Templates